सोन्यापाठोपाठ चांदीची पावले!   

सव्वा लाखापर्यंत मजल मारणार?

अभिजित अकोळकर 

गौरी कशाच्या पावला आली? सोन्या रुप्याच्या पावलाने आली. येथे काय सोने नाणे, येथे काय धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य, अशा जयघोषात गौरीचे स्वागत घरोघरी होते. अर्थात गौरी येण्यास अजून वेळ असली तरी आता सोन्या पाठोपाठ चांदीच्या दराने प्रति किलोमागे एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. एकूणच समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या चांदीने किमतीमध्ये सोन्यापेक्षा एक पाऊल वरचढ टाकले आहे. ती प्रति किलोमागे सव्वा लाखाचा टप्पा गाठू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
सोने आणि चांदी या मौल्यवान धातूचे आकर्षण भारतीयांना विशेषतः महिलांना पूर्वीपासून आहे. विवाह सोहळ्यात दागिने घालून ऐश्वर्य दाखविण्याची चढाओढ लागलेली असते. किती तोळे सोने मुलीला घातले? यावर महिलांमध्ये खमंग चर्चा होते. त्यात चांदीच्या दागिन्यांचा समावेश असतो. चांदीच्या वस्तू जसे पैंजण, ताट वाटी, अत्तर दाणी, गुलाब दाणी, चमचे आदी वस्तू तयार केल्या जातात, त्याची खरेदी केली जाते. कर्नाटकातील हुपरी येथे चांदीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. तेथून महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणी त्या पाठविल्या जातात.
 
ऐतिहासिक काळात भारतीय व्यापारी परदेशात लोखंड आणि मसाल्याचे पदार्थ आदी वस्तू विक्री करताना त्या बदल्यात सोने किंवा चांदी घेत असत.  सोने देशात एवढे वाढले की, मंदिरेदेखील सोन्याने मढवली गेली. अर्थात भारतीय नागरिकांमध्ये दानाची प्रवृत्ती होती. कालांतराने समुद्रामार्गे व्यापार रोडावला. त्याची कारणे वेगळी असली तरी भारत एक संपन्न देश म्हणून पूर्वीपासून ओळखला जात होता.
 
सोने की चिडिया या नावाने हिंदुस्थान प्रसिद्ध होता. त्यामुळे अरब, मुघल, अफगाण, ग्रीक यांच्यासह शक, हुण आदींच्या टोळ्या भारतात घुसल्या होत्या. त्यानंतर दूध आणि मधाचा देश म्हणत ब्रिटिश, डच, पोर्तुगीज देखील हिंदुस्तानात  घुसले. व्यापार हे त्यांचे निमित्त होते. भारताला लुटून ते समृद्ध झाले ही वस्तुस्थिती आहे.
 
सध्या देखील सोने आणि चांदीचा विचार करता बहुतांश भारतीय महिलांकडे दागदागिने रुपात जगातील सर्वाधिक सोने आणि चांदी आहे. एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते. आता सोन्या पाठोपाठ चांदीचे दर प्रति किलोमागे एक लाखावर गेले आहे. सोन्याने तर नवे विक्रम रचले आहेत. त्या प्रमाणात चांदीचे दरदेखील वाढत चालले आहेत. अर्थात दर किलोचे आहेत. 

चांदीची झेप

चांदीचा भाव गेल्या आठवड्यात १,०२,६५० रुपये प्रति किलो होता. एकीकडे चांदीच्या किमती वाढल्याने ग्राहक चिंतेत आहेत, तर दुसरीकडे गुंतवणूकदार आनंदी आहेत. गुरुवारी चांदीचा भाव १,०२,६५० रुपये प्रति किलोवर पोहोचला. चांदी एक लाख झाल्यापासून, त्याची उलाढाल कमी झालेली नाही.
 
३१ मे रोजी सोन्याचा भाव ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ९८,५५० रुपये प्रति किलो होता. त्यानंतर, २ जून रोजी बाजार उघडला तेव्हा एक नवीन विक्रम झाला. चांदीचा भाव पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे गेला. त्या दिवशी, सोन्यानेही मागील दिवसाच्या तुलनेत मोठी उडी घेतली आणि चांदी १,००,६५० रुपये प्रति किलोवर पोहोचली. तथापि, सोन्यासोबतच चांदीचा भावही १ लाख रुपयांच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. आता अशीही चर्चा आहे की, यावर्षी सोने आणि चांदीची किंमत १.२५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. 

चांदीच्या किमतीत वाढ का? 

चांदीच्या किमतीत होणारी वाढ अनेक घटकांमुळे होते. ज्यामध्ये औद्योगिक मागणी, सुरक्षित गुंतवणूक स्थिती आणि भू-राजकीय तणाव यांचा समावेश आहे. सौर पॅनेल, ईव्ही आणि इतर तांत्रिक प्रगतीमध्ये या धातूचा वापर होतो. त्यासाठी औद्योगिक जगाकडून मागणीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदार महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी चांदीकडे नागरिक वळत आहेत.   
 
औद्योगिक मागणी : सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर तांत्रिक प्रगतीमध्ये चांदीचा वाढता वापर आहे. 
  
सुरक्षित गुंतवणूक : आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात, गुंतवणूकदार सोन्याप्रमाणेच सुरक्षित संपत्ती म्हणून चांदीकडे वळतात.   
 
पुरवठा-मागणी असंतुलन : वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठ्यामुळे चांदीच्या बाजारात लक्षणीय असंतुलन निर्माण होत आहे, ज्यामुळे किमती वाढत आहेत.
 
भू-राजकीय तणाव : रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक तणाव वाढून अनिश्चिततेचे वातावरण झाले. त्यामुळे गुंतवणूकदार मौल्यवान धातूकडे वळले आहेत. त्यामुळे चांदीच्या किमतीत वाढ होऊ शकते.   
 
चीनचे प्रोत्साहनपर उपाय : चीनने आपल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी घेतलेल्या आक्रमक प्रोत्साहन उपायांमुळे औद्योगिक उत्पादनात आवश्यक घटक असलेल्या चांदीची मागणी वाढली आहे.   
 
डॉलर कमजोर : डॉलर कमकुवत झाल्यामुळे चांदी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक बनू शकते, ज्यामुळे त्याची किंमत आणखी वाढू शकते.   
 
आर्थिक सुलभता : चलनविषयक सुलभता यासारख्या मध्यवर्ती बँकेच्या धोरणांमुळेही चांदीच्या किमती वाढू शकतात.  
 
गुंतवणूकदारांची आवड : चांदी-सोन्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असल्यामुळे, गुंतवणूकदार चांदीकडे आकर्षित होत आहेत.

भारतातील चांदीचे उत्पादन

भारत २०२२ मध्ये जगातील ११वा सर्वात मोठे चांदीचे उत्पादक होता. राजस्तानमधील सिंधेसर खुर्द खाण ही भारतातील सर्वात मोठी चांदीची खाण आहे. हिंदुस्तान झिंक लिमिटेड भारतातील सर्वात मोठे चांदीचे उत्पादक असून, २०२२ मध्ये ते जगातील पाचवे सर्वात मोठे चांदीचे उत्पादक होते.   

झाकली मूठ सव्वा लाखाची 

चांदीचे दर भविष्यात वाढणारे असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. अर्थात जोखीम आहे. कारण दर ज्याप्रमाणे वाढतात, त्याप्रमाणे कमी देखील होऊ शकतात. पण, दरातील चढती कमान पाहता दर वाढतेच राहणार असे दिसते. सोन्याप्रमाणे चांदी मौल्यवान धातू आहे. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. भारतामध्ये चांदीच्या किमतीत जून महिन्यात ऐतिहासिक वाढ झाली आहे. ५ जून रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा दर प्रति किलो १,०५,००० वर पोहोचला, जो गेल्या १३ वर्षांतील उच्चतम स्तर आहे.

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

Related Articles